वंचित विकास व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आयोजित ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ उपक्रमाचे उद्घाटन
खादीच्या उर्जितावस्थेसाठी महिलांचा पुढाकार महत्वाचा : रवींद्र साठे

पुणे : “स्वातंत्र्यलढ्यात खादीचे योगदान मोलाचे राहिले आहे. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात खादी काही प्रमाणात मागे पडले. खादीला पुन्हा एकदा उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात खादीचा प्रचार व प्रसार करत आहेत. खादीला जनमानसात लोकप्रिय करण्यात महिलांचा पुढाकार व योगदान महत्वाचे आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.
वंचित विकास आयोजित व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रायोजित ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ या पाच दिवसीय उपक्रमाचे उद्घाटन रवींद्र साठे यांच्या हस्ते झाले. म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमावेळी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार गोयल यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी खादी ग्रामोद्योग मंडळाचे प्रतिनिधी योगेश गोगावले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, विश्वस्त जयंत नातू, कार्यवाह मीना कुर्लेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते, सुरेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवार, दि. ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या प्रदर्शनामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचे ३० हुन अधिक स्टॉल आहेत.
रवींद्र साठे म्हणाले, “रोजगार, कृषी, अर्थव्यवस्था या गोष्टींशी खादीला जोडण्याची आवश्यकता आहे. खादी ही समाजाची प्रतिष्ठा आहे. खादी एक विचार, एक मूल्य आहे. हाच धागा पकडून मंडळामार्फत खादी प्रदर्शनाबाबत अनेक नवनवीन पावले उचलली जात आहेत. ‘हर घर खादी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. वंचित विकास संस्थेने महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य उभारण्यात, तसेच खादीचा प्रसार होण्यात मदत होईल.”
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “वंचित विकास संस्थेकडून ‘उद्योगरत्न’ पुरस्कार मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझ्या सर्व ५२७ कर्मचाऱ्यांचा आहे. या पदावर पोहोचण्यापूर्वी अनेक छोटे उद्योग केले. वेळोवेळी वडिलांची मोठी मदत व मार्गदर्शन मिळाल्याने आज कोहिनूर ग्रुप यशाच्या शिखरावर आहे. महिला उद्योजिकांना प्रोत्साहनासाठी ‘विश्व आईचे’ हा उपक्रम राबवला. यशस्वी उद्योजक व्हायचे असेल, तर कष्ट, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास गरजेचा आहे.”
योगेश गोगावले म्हणाले, “आजच्या या प्रदर्शनामुळे समाजातील तळागाळातील महिलांना एक व्यासपीठ मिळाले आहे. आज अशा अनेक संस्था आहेत, ज्यांनी जगाच्या इतिहासात ठसा उमटवला आहे. त्यातीलच एक वंचित विकास संस्था आहे. येणाऱ्या काळात महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे ही काळाची गरज आहे. त्याची सुरुवात अशा उपक्रमातून होणे महत्त्वाचे आहे. महिलांना यातून मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते.”
बिपीन जगताप म्हणाले, “वंचित विकास आयोजित उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. अनेक महिलांना एकत्रित करून अशा पद्धतीने व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर स्वदेशी गोष्टींचा प्रसार प्रचार करणे ही खूप मोठी बाब आहे. खादी ग्रामोद्योगने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. खादीचा प्रचार आणि प्रसार या उपक्रमातून होणार आहे.”या कार्यक्रमादरम्यान ‘ग्रामोद्योग’ मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता जोगळेकर यांनी आभार मानले.-
—————-
‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ची वैशिष्ट्ये-
महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन, आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यासपीठ देणारा उपक्रम- दि. ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले- ग्रीन लीफ कंपनीतर्फे उत्तम प्रतीचे ड्रायफ्रूट निम्म्या किमतीत उपलब्ध होणार- शाळेतील मुलांनी बनवलेल्या हात कागदाच्या वस्तू- बचत गटातील महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ असतील- सिल्क साड्या, हँडमेड ज्वेलरी, कलमकारी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला, हर्बल उत्पादने, गिफ्ट आर्टिकल्स, होम डेकोरेशन, दिवाळी फराळ आदी