महा एनजीओ फेडरेशनतर्फे ५ हजार बीजराख्यांचा अभिनव उपक्रम

पुणे: भारतीय संस्कृती आणि पर्यावरण यांना एकत्र आणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व रक्षाबंधन निमित्त ‘बीज राखी’ ही अभिनव संकल्पना महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने राबविण्यात आली. पर्यावरणपूरक राखीमुळे प्रदूषण टाळण्याबरोबरच बहीण-भावाच्या हळूवार नात्याचे अंकुर आता प्रत्यक्ष जमिनीतून अंकुरणार आहेत.
आदिवासी मंत्रालय व आर्ट ऑफ लिविंग यांच्या वतीने आदिवासी महिलांना रोजगार देण्यासाठी व पर्यावरण रक्षण यासाठी बीज राखी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, मार्गदर्शक चंद्रकांत राठी, कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले, ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्रभरातील सर्वच जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था ज्या महिला पदाधिकारी चालवतात, त्यांना महा एनजीओ फेडरेशनच्यावतीने यंदा बीजराखी देण्यात आली.
शेखर मुंदडा म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्त्व आहे. या सणातून आपण निसर्गाला काय देऊ शकतो, या विचारातून बियाणांची राखी ही संकल्पना सुचली. पर्यावरणपूरक एखादी गोष्ट लोकांना दिली तर ती स्वीकारायला थोडा वेळ जातो. पण, आपली संस्कृती आणि पर्यावरण एकत्र आणले तर लोक लवकरच ते स्वीकारतात. त्यातून पेरणीयोग्य बियांच्या राखीची संकल्पना प्रत्यक्षात आणली.
रक्षाबंधन स्वातंत्र्य दिनानंतर त्या बी पासून एक रोप निर्माण होणार आहे. नवनिर्मिती ही बहिणीने भावाला दिलेली अमूल्य भेट असेल अशी या मागची आमची धारणा आहे.