आर्थिकपुणे

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

पुणे : उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आवश्यक क्लार्कची भरती करा, बँक ग्राहक व कर्मचाऱ्यांची सुरक्षा सक्षम करा, सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करा, पदोन्नती द्या, सर्व शाखा व एटीएमसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारा, कोरोना काळातील प्रशासकीय मनमानी बदल्यांचे धोरण बंद करा, अशा विविध मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना आणि महाबँक नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन करण्यात आले.

शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयासमोर लोकमंगलच्या आवारात बुधवारी हे आंदोलन झाले. फेडरेशनचे धनंजय कुलकर्णी, शैलेश टिळेकर, महासंघाचे रवींद्र जोशी, कर्मचारी सेनेचे अनंत सावंत, नवनिर्माण सेनेचे मनोहन राजापाटील आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.धनंजय कुलकर्णी म्हणाले, “एकीकडे बँकेची उलाढाल, नफा वाढत आहेत. बँकिंग क्षेत्रात महाबँकेचे नाव उत्कृष्ट बँक म्हणून घेतले जाते. बँकेच्या या यशात प्रत्येक कर्मचाऱ्याचा मोलाचा वाटा आहे. खासगीकरण, कोरोनाची परिस्थिती यामुळे सर्वत्र अनिश्चितता असतानाही कर्मचारी चांगले काम करत आहेत. बँकेची उलाढाल, नव्या शाखा, नव्या योजना, सेवा बँकेने आणल्या, मात्र लिपिक कर्मचाऱ्यांची भरती केली नाही. कर्मचाऱ्यांचे मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती, पदोन्नती यामुळे रिक्त झालेल्या जागाही भरल्या गेल्या नाहीत. परिणामी, ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. इच्छा असूनही, चांगली सेवा देण्यात कर्मचाऱ्यांवर मर्यादा येतात. त्यामुळे कर्मचारी भरती लवकरात लवकर होणे, मनमानी बदल्या थांबवणे, हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करणे, बँक शाखा व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था पुरवणे गरजेचे आहे.”

रवींद्र जोशी म्हणाले, “या मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. याआधी निवेदन, ट्विटर मोर्चा काढला आहे. आज येथे धरणे आंदोलन केले जात असून, याची दखल घेतली नाही, तर येत्या २७ सप्टेंबरला एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक संप केला जाणार आहे. तरीही मागण्या मान्य झाल्या नाही, तर २१ आणि २२ ऑक्टोबर या दोन दिवशी देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. बँकेचा वर्धापनदिन दरम्यानच्या काळात येत असल्याने आम्ही सर्व कर्मचारी हा दिवस ग्राहक अभिवादन दिवस म्हणून पाळणार आहोत. असंवेदनशील बँक व्यवस्थापनाला जागे करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट झाली आहे.”

– शाखानिहाय क्लार्कची सरासरी १.९७ वर गेल्या दहा वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, बँकेचा व्यवसाय १,०४,२३० कोटीवरून २,८१,६५९ कोटी म्हणजेच तिपटीने वाढला. शाखांचीही संख्या १४५३ वरून १९४५ पर्यंत गेली. मात्र शाखानिहाय क्लार्कची सरासरी संख्या गेल्या १० वर्षात ४ वरून १.९७ इतकी खाली आली आहे. २००९-१० मध्ये ५८१६ क्लार्क होते. आज ही संख्या ३८४० इतकी आहे. सबस्टाफची संख्याही २८०९ वरून १४५३ पर्यंत खाली अली आहे. त्याचे सरासरी प्रमाण १.९९ वरून ०.७४ इतके खाली आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!