तंत्रज्ञानाच्या युगात हरवली किल्ला संकृती

लहानांपासून जेष्ठांपर्यंत प्रिय असलेला दिवाळी सण जवळ आला. दिवाळी म्हंटलं की आठवते ती रोषणाई, दिव्यांचा झगमगाट, प्रत्येक घराच्या दाराला कंदील, फराळाचा सुगंध. पुर्वी दिवाळी म्हणटले की अजून एक आस असायची ती म्हणजे महाराजांचे किल्ले बनवण्याची, त्यावेळी दिवाळी आणि किल्ला हे जणू काही समीकरणच बनले होते. परंतु आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ही संकृती कुठेतरी हरवली आहे. हाताने किल्ले बनण्याची मज्जा आत्ताच्या लहान मुलांना महितच नाही. दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगात ओढ कमी झाली आहे. मोबाईलच्या जाळ्यात अडकून पडलेल्या मुलांना किल्ले संस्कृतीची ओळख करून त्यांना पुन्हा किल्ले बनवण्यासाठी प्रेरीत करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. आमच्या पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीके आहेत. या गडकोटांच्या स्मृती जपाव्यात आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या नौबती पुन्हा घडाव्यात जणू यासाठीच या किल्ले बनवण्याच्या परंपरेचा उदय झाला असावा. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बांधणीची प्रथा कशी सुरू झाली, याबाबत ठोस तपशील उपलब्ध नाहीत. मात्र, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा लहान मुलांचा सुट्टीतील विरंगुळा जणू परंपराच बनला आहे.
चला तर मग याची सुरुवात आपल्या पासूनच करूया, आपल्या पाल्यांना व कुटुंबातील बाल गोपाळांना किल्ले बनवण्यासाठी अग्रेसीत करूया.महाराजांच्या किल्लांची प्रतिकृती तयार करून मिळणारा तो आनंद शब्दात व्यक्त होणार नाही, मुलांच्या मुखावरील हास्यच सर्व काही सांगून जाते……