पुणेमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

पक्षीय निष्ठा राखून सर्व पक्षांशी सौहार्दता जपणे ही आपली राजकीय संस्कृती- खासदार शरद पवार 

पुणेः- पक्षीय निष्ठा कायम राखत सर्व राजकीय पक्षातील व्यक्तींशी सौहार्दता जपणे ही महाराष्ट्राची आणि खास करून पुण्याची राजकीय संस्कृती आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेतेेे खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. 

ज्येष्ठ नेते अंकुश काकडे लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार गिरीश बापट, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, खासदार श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु.वा. जोशी, सविता जोशी,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अतुल बेनके, अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, महेबुब भाई शेख, रविकांत वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, राजकारणात मतभेद आणि वैचारिक भिन्नता असते. परंतु, त्या मतभेदांचे आणि मतभिन्नतेचे रूपांतर मनभेदामध्ये होता कामा नये. राजकीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत भूमिका घेऊन आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. ज्या कोणाला पुण्याची नस आणि पुण्याची गुणसुत्रे जाणून घ्यायची आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जुन वाचावे. या पुस्तकात पुण्याच्या अमृततुल्य पासून तर पुण्यात साजरा होणारा गणेशोत्सव, उरूस या सगळ्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आढावा घेतला आहे. हे पुस्तक म्हणजे पुण्याचे सर्वांगिण दस्तावेजीकरण आहे. पुणे झपाट्याने बदलत असून शैक्षणिक संस्था, आयटी हब, औद्योगीकीरण, उद्योग आणि रोजगाराच्या संधी यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनत असून शैक्षणिक संस्थांव्दारे शिक्षणाच्या निमित्ताने विविध जाती-धर्माचे विद्यार्थी पुण्यात येतात. त्यांच्या बरोबरीने त्यांचे आचार-विचार आणि संस्कृतीही पुण्यात येत आहे. पूर्वी पेन्शनरांचे पुणे म्हणून ओळखले जाणारे पुणे आयटी, शिक्षण आणि उद्योगाचे हब झालेले आहे. पुण्याने देशाला कायमच विचार देण्याचे काम केले आहे. परंतु, अलीकडे कमी होत चाललेली वाचन संस्कृती आणि कमी होत चाललेला साहित्य व्यवहार ही धोक्याची घंटा आहे. भौतिकदृष्ट्या समाज किती विकसीत आहे, यापेक्षा वैचारिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या समाज किती प्रगत आहे, यावर तो समाज किती पुढे जाईल हे ठरत असते. वाचन संस्कृतीची पाळेमुळे रूजलेल्या पुण्यात ललित साहित्याची उलाढाल प्रचंड मंदावलेली आहे. हातावर मोजण्याइतके ललित साहित्य विक्रेते पुण्यात तग धरून आहेत. 

यावेळी बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले की, चरितार्थ चालविण्यासाठीविविध उद्योग- व्यवसाय करीत फावल्या वेळात राजकारण करीत पुण्यातील आमच्या पिढीची राजकीय जडणघडण झाली आहे. परंतु, आता राजकारणाला व्यवसायाचे रूप देऊन नागरिकांची कामे आणि नागरिकांच्या समस्या दुर्लक्षिल्या जात आहेत. राजकारणात आपल्या विविध पदे मिळाली, तर आपण समाजापासून वेगळे आहोत, असे अलीकडची पिढी मानते आणि इथेच त्यांची चूक होते. 

यावेळी बोलताना प्रा.मिलिंद जोशी म्हणाले की, पुण्याचे ‘पुणेरीपण’ केवळ सदाशिव पेठेत, पुणेरी पाट्या आणि टोमण्यात तसेच एक ते चार विश्रांती घेण्यात सामावलेले नाही. पुण्यातील समाजधुरीणांनी दिलेला विचार देशाने स्वीकारलेला आहे. या पुणेरीपणाचे विस्मरण सर्वांनाच झाले आहे. एकेकाळी पुणे हे पेन्शनरांचे शहर होते. आता ते टेन्शनरांचे शहर झाले आहे. लोकप्रतिनिधींनी समाजप्रती संवेदनशील असलेच पाहिजे, पण त्यांचा अधिकाधिक वेळ दशक्रिया विधीच्या घाटावर किंवा मंगल कार्यालयातच जाणार असेल तर ते समाजहिताची कामे कधी करणार? चांगले रस्ते ,शुद्ध पाणी, स्वच्छ हवा आणि समाजाचे आरोग्य चांगले राहिले असे राजकीय आणि सामाजिक वातावरण एवढ्याच सर्वसामान्य पुणेकरांच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण होत नाहीत. वॉर्डात टाकलेल्या बाकड्यापासून ते उभारलेल्या स्वच्छता गृहापर्यंत यांच्या सौजन्याने या प्रकाराला लोक विटले आहेत.

यावेळी पुस्तकामधील गंमतीशीर किस्से सांगत लेखक अंकुश काकडे यांनी रसिकांशी संवाद साधला. खासदार श्रीनिवास पाटील आणि उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु.वा. जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मेघना माने यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!