
पुणे : सर्जनशील स्त्रिया प्रसंगी संघर्षासाठीही तयार होत्या. दुर्गा भागवत यांनी त्याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्याची आठवण आजच्या लेखिका आणि कवयित्री यांनी ठेवली पाहिजे असे मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, आणि साहित्यदीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित ‘दुर्गेच्या कविता’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर उपस्थित होते.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, ‘गेल्या साठ वर्षात स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वतःसाठी अवकाश शोधले आहे. पुरुषसत्ताक समाजात ‘दुर्लक्षित करण्याचे राजकारण’ स्त्रियांच्या बाबतीत राजकारणापासून सर्व क्षेत्रात झाले. त्यावर मात करून आज स्त्रियांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्त्रियांच्या लेखनातून आणि साहित्यातून बदलत्या स्त्री जाणिवांचा हुंकार समर्थपणे उमटला आहे.
प्रा. जोशी म्हणाले, ‘ मातृत्वाचा गौरव करणाऱ्या देशात स्त्रित्वाची मात्र अप्रतिष्ठा केली जाते. भूगर्भापासून अंतरिक्षापर्यंत सर्व क्षेत्रात आज स्त्रिया आघाडीवर आहेत. तरीही मन विषण्ण करणाऱ्या घटना घडत आहे. अजूनही व्यापक समाजशिक्षणाची आवश्यकता आहे.
‘दुर्गेच्या कविता’ या कविसंमेलनात अंजली कुलकर्णी , प्रिया जामकर, ज्योत्स्ना चांदगुडे, सुनीति लिमये, प्राजक्ता पटवर्धन, योगिनी जोशी, प्रतिभा पवार, निरुपमा महाजन आणि अमिता सामंत या कवयित्री सहभागी झाल्या होत्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन वैशाली मोहिते यांनी केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले.