सुखसागरनगरमध्ये प्रकाश कदम यांच्या विकासकामांचे लोकार्पण
दक्षिण पुण्याच्या पाणीप्रश्नात लक्ष घालणार - अजित पवार

Pune, कात्रज: दक्षिण पुण्यातील नागरिकांना पाणीप्रश्न सतावत असल्याचे अनेकांनी सांगितले असून याबाबतीत महापालिका भेदभाव करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रश्नात पालकमंत्री या नात्याने पूर्णपणे लक्ष घालून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ३८मध्ये नगरसेवक प्रकाश कदम यांच्या विकासनिधीतून करण्यात आलेल्या २०कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम क्रीडा संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय महिला बचत गट हॉल व सुखसागरनगर पोलिस चौकी, कै. किसनराव उर्फ माऊली कदम उद्यान आणि महादेव नगर येथिल ७० लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.
पवार म्हणाले, ‘पिण्यासाठी पाणी देत असताना धरण परिसरातील शेतकऱ्यांनाही पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते. त्यांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरायला हवे. गैरवापर आणि अपव्यय टाळायला हवा. या चार कामांचे लोकार्पण झाल्याचे सांगताना ही कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणांत प्रयत्न करणाऱ्या नगरसेवक प्रकाश कदम आणि प्रतिक कदम यांचे अभिनंदन! परंतु, नागरिकांनी ही कामे होत असताना साथ दिली आहे. या कामांसाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य लाभले असल्याचे पवार म्हणाले. याठिकाणी चांगले क्रीडा संकुल साकारण्यात आले असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील. कायदा व सुव्यवस्था चांगली असेल तर सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येणार नाहीत. सुखसागरनगर पोलिसचौकी नागरिकांसाठी दिलासा देणारे केंद्र ठरेल. पोलिसांनीही नागरिकांना चांगली वागणूक द्यावी. मात्र, राजकीय हस्तक्षेप होत असेल तर कुणाचीही तमा न बाळगता कारवाई करावी असे पवारांनी ठणकावून सांगितले. वाढत्या नगरिकीकरणांमुळे घरे छोटी झाली असून उद्यानांची गरज निर्माण झाली आहे. चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी आणि चांगला वेळ घालविण्यासाठी कै. किसनराव उर्फ माऊली कदम उद्यान सुख-दुःख वाटून घेणारे केंद्र बनेल. तसेच, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्यांना वाटते आता आपल्याला संधी मिळावी तर जुन्यांना वाटते आता शेवट आहे. आतातरी आपल्याला संधी मिळावी. मात्र, यातून सुवर्णमध्य साधत मार्ग काढण्यात येईल असा विश्वास पवारांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम यांनी केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांचे आभार मानत कात्रजच्या विकासासाठी पक्षाकडून कायम सहकार्य मिळत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी आमदार चेतन तुपे यांनी या भागासाठी ४ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले. तर, नगरसेवक प्रकाश कदम यांनी मनोगत व्यक्त करताना या २० कोटींच्या कामांसोबत मोठ्या प्रमाणावर अन्य विकासकामेही करण्यात आल्याचे सांगताना केवळ प्रभाग क्रमांक ३८मध्ये आमदार चेतन तुपे यांच्या निधीतून २ कोटी रुपये निधी मिळाला असल्याचा उल्लेख केला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक युवराज बेलदरे, स्मिता कोंढरे, माजी नगरसेवक सुरेश कदम, माजी नगरसेविका भारती कदम, मगराज राठी, महेश कदम, दीपक गुजर उपस्थित होते. संतोष धुमाळ यांनी आभार मानले.