उलगडणार ‘नेताजींचे’ गूढ
अनुज धर आणि चंद्रचूड घोष कागदपत्रांच्या आधारे उलगडणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याचे रहस्य

पुणे : नेताजी सुभाषचंद्र बोस १८ ऑगस्ट १९४५ ला एका विमान अपघातात गेले. भारताला हाच इतिहास माहिती आहे. पण ते खरेच गेले होते का ? भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना मृत घोषित केले का ? त्यांच्या जगण्यावर किंवा मरणावर राजकारण करायचे होते का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुणेकरांना मिळणार आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर वीस वर्षांहून अधिक काळ संशोधन करणाऱ्या अनुज धर आणि चंद्रचूड घोष हे दोघेही एकाच मंचावरून काही कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि मृत्यूचे गूढ उकलणार आहेत. येत्या रविवारी, २६ मार्चला रात्री ९ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांनी नेताजी याच विषयावर आतापर्यंत विपुल लेखन केले आहे. त्यांनी अनेक वर्षे केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे की, नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते. या संदर्भातील संशोधन सुरू केल्यानंतर नेताजींच्या स्वातंत्र्यपूर्वीचे आणि स्वातंत्र्यानंतरचे अशी दोन वेगळी आयुष्य होती. त्यातील समान धागे शोधण्याचा प्रयत्न धर आणि घोष या जोडीने केला असून त्यांच्या संशोधनाचा हा चित्तथरारक प्रवास ते पुणेकरांसमोर मांडणार आहेत.
—————या प्रश्नांची उत्तरे मिळणार
१.नेताजींचा मृत्यू सरकारने दिलेल्या तारखेलाच झाला ? २. नेताजी १९८५ पर्यंत भारतातील उत्तर प्रदेश मध्ये राहत होते ? ३. नेताजी स्वातंत्र्यानंतरही जिवंत होते ? होते तर सरकारने ते कधी मान्य का नाही केले ? ४. नेताजी नंतर कोणत्या नावाने वावरत होते ? ५. भारत सरकारने आतापर्यंत नेताजींसंदर्भात असलेल्या गोपनीय फाईल्स समोर का नाही आणल्या ?