पुणेमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसामाजिक

एकदिवशीय अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे आयोजन

पाली भाषेला दीर्घ परंपरा आणि इतिहास -डॉ. उज्ज्वल कुमार, पाली विभाग प्रमुख, कोलकाता विद्यापीठ

पुणे :- पाली भाषा ही समृध्द भाषा असून तिला दीर्घ परंपरा आणि इतिहास लाभलेला आहे. भगवान बुद्धांनी त्यांचा उपदेश देखील सर्वसामान्यांची भाषा म्हणून पाली भाषेतच केला होता. पाली भाषा ही भारतासह श्रीलंका आणि अन्य पाश्चात्य देशांमध्ये विखुरली असून त्या भाषेतील तज्ज्ञ आणि अभ्यासक जगभरात आढळून येतात. यावरूनच पाली भाषेची समृध्द परंपरा अधोरेखित होते, असे मत अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि कोलकात्ता विद्यापीठाच्या पाली विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वल कुमार यांनी व्यक्त केले.

पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असल्याने पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पद्मपाणि फाउंडेशन संचलित अभिजात पाली भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने आज आयोजित एकदिवसीय अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन जर्मनी येथील जागतिक कीर्तीचे भाषा तज्ज्ञ डॉ. जेम्स वू हार्टमन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. उज्ज्वल कुमार बोलत होते.

भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सुनील वारे, या संमेलनाचे मुख्य संयोजक पद्मपाणी फाउंडेशनचे राहुल डंबाळे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रतिमा प्रकाशनाचे प्रमुख डॉ. दिपक चांदणे, माजी आमदार आणि पालीचे अभ्यासक गौतम चाबुकस्वार, या संमेलनाच्या मुख्य निमंत्रक सुवर्णा डंबाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेजच्या पाली विभागाचे डॉ. भिमराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या संमेलनात भारतासह म्यानमार, श्रीलंका, व्हीएतनाम, जर्मनी, स्वित्झर्लंड, साऊथ कोरिया, थायलंड या आठ देशातील पाली विषयातील तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना डॉ. उज्ज्वल कुमार म्हणाले की, पाली भाषेत विपूल साहित्याची निर्मिती झाली असून त्या साहित्याचा अनुवाद होणे आवश्यक आहे. जागतिक वारसा लाभलेली ही भाषा असून पाली भाषेचे संवर्धन आणि प्रचार-प्रसारासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. यावेळी बोलताना जर्मनी येथील जागतिक कीर्तीचे भाषा तज्ज्ञ डॉ. जेम्स वू हार्टमन म्हणाले की, पाली भाषा ही अतिशय प्राचीन भाषा आहे. त्यात अभिजात कला आणि साहित्याची निर्मिती झालेली असून आम्ही अनेक प्रकारचे साहित्य पाली भाषेतून आमच्या देशात प्रकाशित केले आहे. पाली सोसायटीची स्थापना करून त्या सोसायटीच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे.

यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सुनील वारे म्हणाले की, अनेक लोकांनी पालीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले. विशेषतः उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. महाराष्ट्रातील नागपूर आणि मुंबई विद्यापीठातील अनेक लोकांनी पत्रव्यवहार करून आणि न्यायालयाचा आधार घेऊन पाली भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले. अभिजात भाषेचे जे निकष आहेत, त्यातील एक निकष म्हणजे ती भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी असा आहे.

पाली भाषा तर तीन हजार वर्षे जुनी आहे. भारतात जे अशोकाचे शिलालेख लिहिले गेले आहेत, ते पाली भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिले गेले आहेत. त्यामुळे पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक प्रयत्न अव्याहत सुरू होते. या सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे तिचा प्रचार-प्रसार होण्यास निश्चितच हातभार लागेल.

यावेळी बोलताना माजी आमदार आणि पालीचे अभ्यासक गौतम चाबुकस्वार म्हणाले की, पाली भाषा धम्माचे अधिष्ठान असून आपल्या राजकीय चळवळीचा तो कणा आहे. आज मराठी भाषेसह इतर भाषांबरोबर पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतानाही त्याचा उत्सव साजरा केला जात नाही, हे खेदजनक आहे. गुजराती, राजस्थानी, सिंधी, बंगाली, पंजाबी अशा नानाविविध भाषांमध्ये पाली भाषेचे अंश सापडतात. याबरोबरच राज्यातील अनेक भाषांमध्ये पाली भाषेचे धागेदोरे सापडतात. यावरूनच पाली भाषा किती पुरातन आणि समृध्द आहे, हे लक्षात येते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाच्या डॉ. दीपाली पाटील यांनी केले. माजी उपमहापौर आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. या संमेलनाचे मुख्य संयोजक पद्मपाणी फाउंडेशनचे राहुल डंबाळे यांनी संमेलन आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. मुख्य निमंत्रक सुवर्णा डंबाळे यांनी स्वागत केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटन सोहळ्याच्या आधी ग्रंथपूजन आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यानंतर ‘चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या शिलालेखातील मानवतावादी संदेश’, ‘पाली भाषा-संधी वआव्हाने’ आणि ‘पाली भाषेचे साहित्यातील महत्त्व व त्याचा विकास’ या विषयांवरील सत्रांमध्ये तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!