पुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

‘विठू माऊली माझी‌’ रौप्य महोत्सवी कार्यक्रम बुधवारी‌

'मराठी अभिजात‌’ पुस्तकाचे शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार प्रकाशन

पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेला ‌‘विठू माऊली माझी‌’ हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आयोजित स्पर्धेतील कवितांचा समावेश असलेल्या ‌‘मराठी अभिजात‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. 17 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रम सायंकाळी 5 ते 8 या वेळात बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठलकाका मणियार, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल, वरिष्ठ पत्रकार श्रीराम पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक, इतिहात तज्ज्ञ संजय सोनवणी यांची सन्मानिय उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी खुला आहे.

साहित्य, कला, क्रीडा आणि संस्कृतीच्या क्षेत्रात शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेस शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे, अश्विनी पाचरणे, विवेक थिटे उपस्थित होते.

अभिजात दर्जासाठी ग्रामीण कवींचा उत्स्फूर्त प्रतिसादमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील सुमारे 600 कवींनी स्पर्धेसाठी कविता पाठविल्या होत्या. त्यातील निवडक 200 कवितांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनाला ग्रामीण भागातील कवींनी प्रतिसाद दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील कवींनी घेतलेला पुढाकार ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे, असे लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान ‌‘विठू माऊली माझी‌’ या कार्यक्रमातून पुणेकर रसिकांना आषाढी वारीचा आनंद सोहळा अनुभवण्याची संधी मिळत आहे. या वर्षी सुप्रसिद्ध गायक सुरंजन खंडाळकर आणि स्वरप्रिया बेहेरे यांच्या सादरीकरणातून रसिकांना पंढरीच्या वारीची अनुभूती घेता येणार आहे. अमृता ठाकूरदेसाई-दिवेकर, निलेश देशपांडे, विक्रम भट, केदार मोरे, सोमनाथ साळुंखे साथसंगत करणार असून सचिन इंगळे यांनी संगीत संयोजन केले आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र खरे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पुणेकरांनी कार्यक्रमाचे आनंद घ्यावा, असे आवाहन लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!