मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसाठीच्या दवंडी मोर्चाची सुरुवात

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसाठीच्या मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या दवंडी मोर्चाची पुण्यात सुरुवात झाली. या मोर्चाचे आयोजन हे सकल मातंग समाजाने केले आहे. पुण्यातील क्रांतिगुरू लहूजी साळवे यांच्या स्मारक स्थळावरून या पायी दवंडी मोर्चाची सुरुवात झाली असून, दिनांक २० जुलै २०२३ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे.
मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण देऊन (अ,ब,क, ड) वर्गीकरण करण्यात यावे, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्यात, अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र (आर्टी)ची निर्मिती व्हावी. तसेच शहीद झालेल्या कै. संजय टासतोडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून कुटुंबातील व्यक्तीला नोकर भरतीत समाविष्ट करण्यात यावे अश्या मातंग समाजाच्या या अनेक मागण्या राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत.
श्री. रमेश तात्या गालफाडे, अध्यक्ष, बहुजन रयत परिषद, यावेळी म्हणाले की, राज्यात मातंग समाजावरील अन्याय सातत्याने वाढत असून त्यासाठी मातंग समाजाची एकजूट घडवून आणण्यासाठी. तसेच मातंग समाजाच्या समोरील अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या दवंडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही आमचा लढा हा अजून तीव्र करू.
तसेच रमेश तात्या गालफाडे यांनी बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येनं २० जुलै २०२३ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या मोर्चाला हिंदू राष्ट्र सेनाचे प्रमुख धनजंय देसाई यांनी पुणे येथे उपस्थित राहून पाठींबा दिला आहे.