
Pune: दोन दिवसांपूर्वी धनगर समाजाने लक्ष्मण हाके यांना फोर्चूनर गाडी भेट देऊन त्यांच्या ओबीसी समाजासाठीच्या प्रामाणिक कार्याचा सन्मान केला. गेल्या 2-3 वर्षांपासून हाके यांनी केलेल्या कार्याची दखल घेत धनगर समाजाने दाखवलेले दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र गेल्या 12-13 वर्षांपासून ओबीसी समाजासाठी अहोरात्र लढणारे, पुणे, अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे, सुप्रीम कोर्टात 27% राजकीय आरक्षण परत मिळवून देणारे ऍड. मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील यांचा सन्मान मात्र पुण्यातील माळी समाजाने काही अपवाद वगळता केलेला दिसत नाही याची खंत देखील व्यक्त केली जात आहे.
हे दोन लढवय्ये कायद्याची लढाई लढताना किती कष्ट घेत असतील, किती त्याग करत असतील, याचा विचार कुणीच करत नाही. चळवळीत निष्पक्षपणे काम करणाऱ्यांचा सन्मान, कौतुकाची थाप मिळाली नाही, तर त्यांचे मनोधैर्य खचण्याची भीती आहे. नुकताच हडपसर येथील सावता माळी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात राजकीय नेते, गावातील पाटील यांना निमंत्रण देऊन, त्यांचे फोटो आणि नावे पत्रिकांवर झळकवून मानपान करण्यात आले. परंतु, महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्वाचे प्रतीक असलेल्या मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील यांचे नावही निमंत्रण पत्रिकेत नव्हते, ना त्यांना मनापासून बोलावले गेले. हे खरोखरच दुर्दैवी आहे.

आवाहन: पुण्यातील माळी आणि ओबीसी समाजाने आत्मपरीक्षण करावे. राजकीय नेते, कार्यकर्ते येत-जात राहतील, पण मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील यांच्यासारखे प्रामाणिक लढवय्ये पुन्हा निर्माण होणे कठीण आहे. त्यांना गाडी नको, पण एखादी शाल, नारळ, किंवा मनापासून कौतुकाची थाप तरी द्या!
धनगर समाजाने हाके यांना फोर्चूनर देऊन सन्मानाचा आदर्श ठेवला. माळी समाजानेही आपल्या लढवय्यांचा सन्मान करावा.त्यांना गाडी घोडा असली कसलीच अपेक्षा नक्कीच नाही, फक्त केलेल्या कामाचे मोठया मनाने कौतुक गरजेचं. सुप्रीम कोर्टातील लढाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य झाल्या, पण त्याच लढाईचे खरे हिरो विसरले जाणे हे अंतर्मनाला चटका लावणारे आहे.
सर्व पक्षाच्या इच्छुक ओबीसी उमेदवारांनी ह्याबाबत विचार करावा. ओबीसी समाजाची मते मिळण्यासाठी त्यांना त्याचा निश्चित फायदा होईल. चला, समाजासाठी लढणाऱ्या या माणसांचा सन्मान करूया. नितीन बोराटे पुणे यांनी लिहिलेली अशा प्रकारची पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.