Uncategorized

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे खादी संकल्पनेवरील ११ वे ‘स्पार्क २०२३’ वार्षिक प्रदर्शन

पुणे : “खादी हे भारतीय संस्कृती, परंपरेचे दर्शन घडवणारे शांतीचे प्रतीक आहे. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी कल्पकता, नाविन्यता वापरून वैविध्यपूर्ण अन् सुंदर उत्पादने बनवली आहेत. त्यांच्या या कलाकृती जगभर जाव्यात. नव्या रंगसंगती, कल्पना यातून खादीचे असंख्य उत्पादने तयार करता येतात, हे या प्रदर्शनातून दिसते,” असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीजच्या सरिताबेन राठी यांनी केले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे (एसआयएफटी) खादी संकल्पनेवर आयोजित ‘स्पार्क २०२३’ या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन सरिताबेन राठी यांच्या हस्ते झाले.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी खादी पासून बनवलेल्या विविध २१०० प्रकारच्या कलात्मक उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. येत्या रविवारपर्यंत (दि. २६ मार्च) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले असणार आहे.यावेळी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संचालक सचिन इटकर, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध बडवे, उद्योजिका रितू अग्रवाल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदीप बर्वे, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा संजय चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, ‘एसआयएफटी’च्या प्राचार्या प्रा. रेणुका घोसपुरकर, विभागप्रमुख प्रा. पूजा विश्वकर्मा, प्रा प्रियांका कामठे आदी उपस्थित होते.

डॉ. विठ्ठल जाधव म्हणाले, “खादी हे संयम, शांती, भारतीय संस्कृती व राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादनांना मागणी वाढली आहे, त्याचप्रमाणे खादीविषयी भारतीयांच्या मनात स्वाभिमान जागवला जात आहे. कल्पक व सुंदर कलाकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. हे संपूर्ण जगापर्यंत पोहोचायला हवे. त्यासाठी खादीवरील या उपक्रमाचा माहितीपट तयार करून तो सर्वदूर प्रसिद्ध व्हायला हवा. खादीचा उपयोग वाढला, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

“अनिरुद्ध बडवे म्हणाले, “भारतीय परंपरा, संस्कृतीचे दर्शन खादीमधून होते. गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रात पुन्हा पहिले दिवस येत आहेत. ‘सूर्यदत्त’ने खादी हा विचार पुढे नेण्यासाठी राबविलेला हा उपक्रम देशाच्या नावलौकिकात भर घालणारा आहे. धर्माधिष्ठान असलेले कार्य आपल्याला यशाकडे घेऊन जाते. ‘सूर्यदत्त’ने हाती घेतलेले हे कार्य सकारात्मक ऊर्जा देणारे असून, अशा उपक्रमांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे.

“संदीप बर्वे म्हणाले, “खादी भारताचे राष्ट्रीय वस्त्र आहे. महात्मा गांधी यांनी खादीला शांती आणि उद्यमशीलता निर्माण करण्याचे माध्यम म्हटले आहे. गांधीजींचा हाच विचार सूर्यदत्त परिवार पुढे नेत असल्याचा आनंद वाटतो. आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणाऱ्या खादीवरील या उपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी गांधीभवनमध्ये ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना संधी देणार आहे. खादीच्या वापरामुळे आपल्याकडील अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

“प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “खादी हे केवळ वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे, हा संदेश घेऊन फॅशन टेक्नॉलॉजीच्या १०० विद्यार्थ्यांनी खादीचा वापर करून २१ दिवसांत तयार केलेल्या विक्रमी २१०० उत्पादनाचे हे प्रदर्शन आहे. पर्यावरणपूरक नैसर्गिक तंतूंपासून, खादीचा उपयोग करून ही उत्पादने बनवण्यात आली आहेत. ‘सूर्यदत्त’ संस्था नियमितपणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यासाठी, भविष्यातील उद्योग व रोजगार निर्मितीसाठी सूर्यदत्त स्टार्टअप व्हेंचर अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात हातभार लावत आहे. या उपक्रमाची नोंद अनेक वर्ल्ड रेकॉर्ड संस्थांनी घेतली आहे. ग्रामीण, आदिवासी भागातून आलेले हे विद्यार्थी खादीला देशाचा राष्ट्राभिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खादीपासून शक्य ते सर्व प्रकारचे उत्पादन बनवण्यावर त्यांनी भर दिला आहे. बॅग्ज, ऍक्सेसरीज, कपडे, लाइफस्टाइल उत्पादने, भेटवस्तू अशा २१०० उत्पादनांचा यात समावेश आहे.”

“देशभरात तसेच जागतिक स्तरावर खादीच्या कपड्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने खादीच्या कपड्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम ‘सूर्यदत्त’ने हाती घेतला आहे. या वस्तू बनवताना पर्यावरणपूरकतेलाही प्राधान्य दिले आहे. अनेक छोट्या तुकड्याचा पुनर्वापर करून लक्षवेधक वस्तू बनवल्या आहेत. खादीमधील सूताप्रमाणे पर्यावरण, व्यवस्था आणि समाजातील धागे विणून राष्ट्राची बांधणी करण्यात युवकांनी योगदान द्यावे, हा या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश आहे,” असे प्रा. रेणुका घोसपुरकर यांनी सांगितले.

_ नवीदिल्लीत खादी प्रदर्शन’

सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी खादीची खूप सुंदर व कलात्मक उत्पादने बनवली आहेत. खादी ग्रामोद्योग अंतर्गत केंद्र सरकार खादीच्या वापराला व उद्योगाला प्रोत्साहन देत असून, हा विभाग केंद्राच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) अंतर्गत आहे. या खात्याचे मंत्री नारायण राणे यांच्याकडे हा प्रदर्शनाचा अहवाल पाठवून लवकरच हे खादीवरील प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरवण्यासाठी पुढाकार घेऊ. त्यादृष्टीने विद्यार्थी व ‘सूर्यदत्त’ परिवाराने तयारी करावी, असे सचिन इटकर यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!