
पुणे(प्रतिनिधी) : वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या रक्त तुटवड्याच्या बातम्या चिंताजनक आहे. रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार करता येत नसून ते आपण माणसांनी केलेल्या रक्तदानातुंच संकलन करणे शक्य आहे. त्यामुळे रक्तदान करा! रक्तदानाने आपल्या शरीरात कोणतेही दुष्परिणाम होत नाही तर उलट रक्त शुद्ध होते. अशे आवाहन सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. विठ्ठल जाधव यांनी केले.
शांतिदूत परिवार आणि एल.ओ.सी. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा ७५वा प्रजासत्ताक दिन व सेवानिवृत्त विशेष पोलीस निरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. विठ्ठल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरा प्रसंगी डॉ. विट्ठल जाधव बोलत होते. शुक्रवार दि. २६ जानेवारी २०२४ रोजी, एल. ओ. सी. हॉस्पिटल सदाशिव पेठ, येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण १२३ रक्त पिशव्यांचे संकलन झाले, यासाठी आदर्श ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
यंदाच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले दिव्यांग विद्यार्थी आणि रस्त्यावर भिक्षा मागून उदर निर्वाह करणाऱ्या माता/महिलांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. आयुष्भर फक्त मागण्याचे काम करत असलेले भिक्षेकरी आता देण्याची भावना ठेवत आहे हाच खरा बदलता भारत म्हणावा लागेल. सकाळी तयार होऊन ध्यजावंदन करत या भिक्षेकरी महिलांनी रक्ताचे दान करून देशाला संदेश दिला आहे. अशे मत डॉ. अभिजीत सोनवणे यांनी व्यक्त केले.